मान्सून केरळमध्ये दाखल! हवामान विभागाची घोषणा; विदर्भातही पावसाची शक्यता

सत्य लढा न्युज - राज्यात गेल्या आठवड्यापासून पूर्वमान्सूनने जोरदार हजेरी लावल्यानंतर आता मान्सूनने केरळमध्ये आठ दिवस आधीच सरप्राईज एन्ट्री घेतली आहे. मान्सून अखेर केरळमध्ये दाखल झाला असल्याची घोषणा भारतीय हवामान खात्याने (IMD) केली आहे. यापूर्वी 2009 मध्ये मान्सून केरळात 23 मे रोजी दाखल झाला होता. त्यानंतर 15 वर्षांनी मान्सून इतक्या लवकर केरळात दाखल झाला आहे. आता पुढील चार ते पाच दिवसांत कोकणात दाखल होण्याची शक्यता असून कोकणात सध्या जोरदार मान्सूनपूर्व पाऊस सुरु असून. मुंबईत 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. केरळ हे मान्सूनचे भारतातील प्रवेशद्वार मानले जाते. केरळात प्रवेश केल्यानंतर नैऋत्य मोसमी वारे अर्थात मान्सून देशभरात आगेकूच करतो.

राज्यातील काही भागात मुसळधार पावसाची शक्यता

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये हलक्यापासून मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे, तर नाशिक आणि परिसरात जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे, तसेच सातारा, सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस अपेक्षित आहे.

विदर्भातही पावसाची शक्यता

मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यांसह पावसाची शक्यता आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे.

हवामान खात्याकडून अधिकृत घोषणा

नैऋत्य मोसमी पाऊस आज (24 मे) केरळमध्ये दाखल झाला आहे. दरवर्षी  1 जूनच्या तारखेला केरळमध्ये दाखल होणारा पाऊस यंदा आठवडाभर आधीच दाखल झाला असल्याचं भारतीय हवामान विभागानं सांगितलं. 2009 नंतर भारताच्या भूमीवर हंगामी पावसाची ही पहिलीच सुरुवात असल्याचं IMD नं म्हटलं. मान्सून लवकर दाखल झाल्याने सर्वसामान्यांसह शेतकऱ्यांमध्ये सकारात्मक चित्र आहे.

पूर्व-मध्य अरबी समुद्र व त्याला लागून असलेल्या ईशान्य अरबी समुद्रात तसेच कोकण-गोवा आणि दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीजवळ व किनारपट्टीवर 24 ते 25 मे दरम्यान ताशी 45-55 किमी  ते ताशी 65 किमी वेगाने झंझावाती वारे वाहण्याची शक्यता आहे.

केरळनंतर पुढील काही दिवसांमध्ये मान्सूनचा प्रवेश दक्षिण आणि मध्य भारतात होणार आहे. दरम्यान दक्षिण कोकण आणि गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून या भागांत प्रचंड पाऊस सुरु आहे.येत्या 36 तासांत राज्यातील अनेक भागांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील चार ते पाच दिवसांत कोकणात दाखल होण्याची शक्यता असून  मुंबईत 1 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता आहे.

टिप्पणी पोस्ट करा

थोडे नवीन जरा जुने